माझी शाळा कंची

माझे आईवडील उर्दू भाषा बोलायचे. आम्ही भाऊबहिणीही एकमेकांशी उर्दूतच बोलत असू. माझे लग्न झाले. माझी पत्नी मराठी भाषा बोलणारी. तिच्या कुटुंबाची भाषा मराठी. आम्ही घरात मराठीच बोलतो. आम्हाला मुलगी झाली. तिला शाळेत घालायची वेळ आली. लोक म्हणाले, ‘‘उर्दू शाळेत घाला.’’ मी म्हणालो, ‘‘तिच्या आईची भाषा मराठी असल्याने मराठीच बरे पडेल.’’ आम्ही आमच्या मुलीला प्रवेश घ्यायला शाळेत नेले. मुख्याध्यापकांच्या खोलीत सरस्वतीची प्रतिमा दिसली. मी विचारले, ‘‘ही प्रतिमा कशासाठी?’’ मुख्याध्यापक म्हणाले, ‘‘आम्ही दररोज सरस्वती-वंदना घेतो. त्या वेळेस या प्रतिमेची पूजा केली जाते.’’ मला माझी मुलगी अशा शाळेत घालायची होती, जेथे कोणत्याही धर्माचे संस्कार केले जाणार नाहीत.

मी उठलो. दुसर्‍या शाळेत गेलो. तेथेही तेच. मुख्याध्यापक म्हणाले, ‘‘आमच्या शाळेत खूप चांगले संस्कार केले जातात. मुलांकडून मनाचे श्लोक’ पाठ करून घेतले जातात.’’ आणखी एका शाळेत गेलो तेव्हा पाहिले की, मुले चक्क रामरक्षा म्हणत आहेत. मला हवी असलेली शाळा कोठेच सापडेना. शेवटी माझा नाइलाज झाला. अखेर घरापासून जवळ असलेल्या एका मराठी शाळेत तिचे नाव घातले. एके दिवशी तिने मला तोंडपाठ केलेला गायत्री मंत्र म्हणून दाखवला. तेव्हा माझ्या मनात चर्र झाले. हे लोक लहान लेकरांना माणसासारखे का जगू देत नसतील? हा प्रश्न मला सतत अस्वस्थ करत राहिला.

दरम्यान खूप मोठा काळ गेला. माझ्या मुलाचे लग्न झाले. त्याची बायको उर्दू भाषक. मी माझ्या मुलाला सांगितले, ‘‘आपण आपल्या घरात मराठी बोलतो; कारण आपल्या घरातील आई मराठी आहे. आता तुझ्या घरात उर्दू भाषा बोलली गेली पाहिजे. कारण तुझ्या घरातील आई उर्दू भाषा बोलणारी आहे. जसा मी मराठी शिकलो तसे तुला उर्दू शिकावे लागेल.’’ माझ्या मुलाला माझे म्हणणे पटले. त्यांना मुलगा झाला. आम्ही त्याच्यासाठी चांगली शाळा शोधू लागलो. मुलीच्या वेळेसचा अनुभव माझ्या गाठीशी होता. तरी मला वाटले की, मोठा काळ लोटून गेला आहे, परिस्थिती बदलली असेल. त्या काळात कॉम्प्युटर नव्हता, टीव्हीचा एवढा प्रचार झालेला नव्हता, मोबाईलचा तर पत्ताच नव्हता. आमच्या गावात इंटरनेट आलेले नव्हते. आता जग आधुनिक झालेले आहे. माझ्या मुलीला मिळाली नसली तरी नातवाला ‘माणसांची शाळा’ नक्की मिळेल.

उर्दू माध्यमातून इंग्रजी शिकवणार्‍या शाळेत गेलो. तर त्यांच्या फलकावरच ‘इस्लामी शाळा’ असे लिहिलेले. दुसर्‍या शाळेचे प्रॉस्पेक्टस पाहिले. त्यात धार्मिक शिक्षणाची खास सोय असल्याचे आवर्जून नमूद केलेले होते. तिसर्‍या एका शाळेत पोचलो तर तेथील मॅडम बुरखा घालून रिक्षातून उतरताना दिसल्या. म्हटले आपल्याला हवी असलेली ‘माणसांची शाळा’ या माध्यमातदेखील मिळणार नाही. ज्या अगतिकतेने मुलीला मराठी माध्यमाच्या शाळेत घालावे लागले होते, सुमारे 25-30 वर्षांनंतर नेमक्या त्याच अगतिकतेने मला माझ्या नातवाला उर्दू माध्यमाच्या एका शाळेत दाखल करावे लागले.

एके दिवशी माझा मित्र त्याच्या शाळेत गेला. संस्थाचालकांनी म्हणे माझ्या नातवाला बोलवून घेतले. उण्यापुर्‍या चार वर्षांचा नातू. गोड आणि चुणचुणीत आहे. येताच त्याने सगळ्यांना सलाम केला. संस्थाचालक म्हणाले, ‘‘कलमा याद है?’’ ‘‘जी, हां’’ म्हणून लगेच त्याने अख्खा कलमा तोंडपाठ म्हणून दाखवला. माझा मित्र त्याचे कौतुक करून हे सांगत होता. पण माझ्या मनात पुन्हा तसेच चर्र झाले; जसे मुलीकडून गायत्री मंत्र ऐकताना काही वर्षांपूर्वी झाले होते. हे लोक लेकरांना माणसासारखे का जगू देत नसतील? हा प्रश्न मला पुन्हा अस्वस्थ करू लागला.

मी वेगवेगळ्या धर्ममार्तंडांना विचारले, ‘‘लहान मूल वारले तर ते स्वर्गात जाते की नरकात?’’ सगळ्या धर्मांच्या मार्तंडांनी एका सुरात सांगितले, ‘‘ते थेट स्वर्गात जाते कारण ते निरागस असते.’’ मी म्हणालो, ‘‘असे असेल तर लहान मुलांच्या शाळांत धार्मिक संस्कार का केले जातात?’’ शाळेतील धर्मसंस्कार ही बालकांची गरज नसून ती वडीलधार्‍यांची गरज आहे. थोरांच्या गरजेसाठी मुलांवर ते ओझे लादले जाते.

बागेत उमललेली सुंदर फुले, आपल्या टेबलावरील फ्लॉवरपॉटमध्ये शोभून दिसतील म्हणून, निर्दयपणे खुडली जातात. प्रत्येक धर्माच्या टेबलांवर अशा निर्जीव फुलांची सजावट मांडली जाते. या फुलांचा वास येत राहावा म्हणून हे लोक त्यावर आपल्या संस्कारांच्या अत्तराच्या बाटल्या ओतत राहतात. मुलांचे भावविश्व कलुषित करणारे धार्मिक संस्कार लहान मुलांच्या शाळांमधून कधी हद्दपार होतील कोणास ठाऊक?

निदा फाजली म्हणतात,

हिंदू भी मजे में है, मुसलमान भी मजे में

इन्सान परेशां है, यहां भी और वहां भी…

मला अजूनही ‘माणसांची शाळा’ सापडली नाही.

 

Amar_Habibअमर हबीब

habib.amar@gmail.com

लेखक मुक्त पत्रकार व स्वतंत्रतावादी कार्यकर्ता असून व्यवसायाने प्रकाशक आहेत. ‘परिसर प्रकाशन’ ही प्रकाशन संस्था ते चालवतात.