रिलेशानी कार्यशाळा –

जुलै च्या १,२,३ या तारखांना खेळ घराच्या ८वी,९वी,१०वी च्या मुलांसाठी डॉक्टर मोहन देस यांच्या आभा गटाने ‘ रीलेशानी ‘ शिबिर घेतले. स्वतःच्या शरीराची ओळख, स्त्री पुरुष समभाव आणि लैंगिकता शिक्षण, माध्यमांचा प्रभाव या सगळ्या विषायांसमवेत माणसा माणसांतले नातेसंबंध कसे निकोप, सुरेल राहतील असा मोठा आवाका होता. विविध कला आणि संवादाच्या माध्यमातून शिबिराचे आकार घेतला. शिकणे, वृत्तिविकास तर झालाच त्याबरोबर धमाल आली.

सोमवारी ४ जुलैला या सर्व सहभागी मुलांनी ते या रीलेशनी शिबिरातून काय शिकले हे त्यांच्या पालकांसमोर सादर केले.

डॉ. मोहन काका, श्रुती ताई हे सुद्धा सहभागी झाले होते. सुरुवातीला तीन दिवसाच्या कार्यशाळेचे काही फोटोज् पालकांना दाखवले. मुलांचे काही गट केले होते त्यानुसार मुलांनी सादर करायचे होते. त्यामध्ये मुलांना या शिबिरात विचारलेले काही प्रश्न मुलांनी पालकांना विचारले. जसे की मुलाला मुलगी, ‘मुलीला मुलगा मित्र म्हणून असावा का? इंटरनेट, फेस बुक, whats app या माध्यमातून काही जण सेक्सटिंग करतात तर हे चांगले की वाईट?’ असे प्रश्न मुलांनी डायरेक्ट त्यांच्या पालकांना विचारले. काही गटांनी शिबिरात घेतलेली गाणी सादर केली उदा.या ग या, शरीराच्या या गावाला, माझ्या अंगणात….,

काही गटांनी नाटकांच्या माध्यमातून प्रसंग उभे केले आणि त्यावर चर्चा केली, स्त्री आणि पुरुषाचे शरिरशास्त्र समजून सांगितले. गर्भाशय, मासिक पाळी, बाळ कसं तयार होतं? या सर्व गोष्टी मुलांनी वैज्ञानिक दृष्ट्या एकही चुकीच्या गोष्टी न जाता खूप उत्तम , सविस्तर पालकांना समजून सांगितल्या.

विशेष कौतुक – मुलांनी ज्या प्रकारे लीड घेतला होता तो उत्तम होता. मुलांनी पालकांना बोअर, कंटाळवाणे नाही होणार याची काळजी घेऊन प्रत्येक पालकाला त्यांची मतं मांडायला सांगितली, एखादा नाजूक मुद्दा जसा की – पुरुषाचे लिंग, त्यात शुक्राणू तयार कसा होतो, जेव्हा लघवी येते तेव्हा शुक्राणू ची पिशवीला झडप बंद होते या सारखे मुद्दे मुलांनी खूप सहज , न लाजता, न घाबरता पटवून दिले. आज मुलांचा आत्मविश्वास, हजरजबाबीपणा , आपले बोलणे पटवून देण्याची धडपड , एकमेकांना सहकार्याची भावना , दुसऱ्याच्या मताचा आदर, स्वीकार , त्यावर आपले मत पटवून देणे यासोबतच मोठ्या माणसांना बोलण्यासाठी, त्यांना काही समजून सांगण्यासाठी लागणारा आवाजाचा योग्य टोन, हावभाव कौशल्य, शरीर भाषा ,eye contact या सर्व गोष्टी वापरताना मुलं दिसली.

जोरदार पाऊस सुरू होता तरीही पालक आले. मुलांनी सांगितलेले समजून घेतले, पालकांनाही खूप चांगले वाटले. सहभाग चांगला होता. पालक सभा ७.१० वाजता सुरू झाली आणि ८.४५ वाजता संपली पण इतका वेळ पालक घरी जेवण बनवायचे होते तरीही बसून राहिले. असं म्हणले नाहीत की आम्हाला घरी जायचे आहे. त्यांचेही कौतुक वाटले!

एकंदरीत या तीन दिवसाच्या रीलेशानी workshop मुळे मुलांमध्ये, पालकांमध्ये, मुलं आणि तायांमध्ये खूप मनमोकळा संवाद झाला/ होऊ लागला आहे.

मोहन काकांची टीम, खेळघर ताया/ volunteer टीम, पालक आणि मुलं या सर्वांमुळे हे शक्य झाले त्यांचे सर्वांचे आभार!