प्रिया नागेश वग्गे (१२ वी कॉमर्स)

मुलींच्या मागे खूप ‘कामे असतात. धाकट्या भावंडाना सांभाळणे व त्यांच्याकडे लक्ष देणे, घरात आईला मदत करणे, पाहुण्यांचे करणे यासारखी. याउलट मुलग्यांना घरात काहीच कामे नसतात. त्यामुळे मुलींना खेळघराला जाता येत नाही की अभ्यासाला वेळ मिळत नाही. मुलग्यांच्या शिक्षणाला आई • बाबा महत्त्व देतात, पैशांची किंवा इतर गोष्टीची साथ देतात पण ती मुलींना मिळत नाही. मुलगी दहावीमध्ये नापास झाली किंवा चांगले मार्क नाही मिळाले तर मुलीला पुढे शिकण्याची संधी नसते. मुलग्यांना मात्र कमी मार्क मिळाले तरी पुढे शिकण्याची संधी असते.

माझा एक प्रश्न आहे मुलगी संध्याकाळी लवकर घरी यावी असे प्रत्येक आईला वाटते, पण मुलगे मात्र रात्रीचे बारा वाजता घरी आले तरी चालते. मुलग्यांना कोणीच विचारत नाही. त्यांच्या वागण्याकडे लक्ष न दिल्यामुळे मुलगे वाईट वळणाकडे झुकू शकतात.

सुदैवाने मला खूप चांगले आई-बाबा मिळाले आणि खेळघराची साथ आहे त्यामुळे मी आज इतके शिकत आहे. या पुढेही भरपूर शिकेन. माझी अशी इच्छा आहे की आपल्या वस्तीतल्या प्रत्येक मुलीला आई बाबांची साथ असावी. खेळघराची साथ मिळावी. प्रत्येक मुलीने शिकावं, चांगली करिअर करावी, आपल्या पायावर उभे राहावे असे मला मनापासून वाटते.