मला वाटतं-

परवा टी.व्ही.वर सौंदर्य स्पर्धांच्या स्टाइलमध्ये केलेला एक कार्यक्रम पाहण्यात आला. एखादं चिमुकलं आणि त्याची आई यांच्या टीममध्ये असलेली ही स्पर्धा. बाळ (मुलगा किंवा मुलगी) आणि त्याची आई, छानसं नटून-थटून जोडीनं त्या रॅम्पवर चालत येत, ओळख करून देत आणि परत ऐटीत आपल्या मूळ जागी जात. अशा दहा-पंधरा जोड्या एकामागून एक आल्या आणि आईनं शिकवलेलं, ठरवलेलं, बाळ बोललं! आईनं स्वत:देखील मी माझ्या बाळाला कसं वाढवते, कसा वेळ देते, मुलानं काय व्हावं वगैरेचं वर्णन केलं.

या सर्वात आईशिवाय बाळाला घडविण्यात आणखी कुणाचं तरी योगदान असतं याचा उल्लेख काहीसा अभावानंच जाणवला, आढळला. बाबा, ताई-दादा, आजी-आजोबा, काका-काकी, मामा, मावशी, शेजारी इतकंच नव्हे तर सांभाळणार्याल मावशी या सर्वांचासुद्धा त्या मुलांच्या वाढीत, विकासात वाटा असतो हे आई विसरली होती का?

बरं, बाळानं जी स्वत:ची ओळख करून दिली, ती त्याला त्याच्या आईनं शिकविली होती. त्याची स्वत:ची पण दुसर्या्नं करून दिलेली !

खरं तर लहान मूल थोडंसं मोकळं झालं तर स्वत:चा छान परिचय देतं. पण त्याला आपण तशी संधी दिली तर ! अशी संधी द्यायला हवी. आपण काय करतो- असं बोल, असा उभा रहा, असा वळ, असं कर असं सांगतो. त्याप्रमाणे तो प्रयत्न करतो. जिथं चुकतो, विसरतो- तिथं आईच्या तोंडाकडे पाहतो किंवा माघार घेतो.

पण एकदा लहानपणापासून आईनं तयारी करून द्यायची आणि आपण तसं करत राहायचं अशी सवय जडली तर ही मुलं स्वावलंबी कशी आणि कधी व्हायची? जीवनात येणार्याक अधिक-उण्या प्रसंगाला कशी सामोरी जायची?
मुलांना सर्वकाही विनासायास, आयतं, जागेवर उपलब्ध करून देणं म्हणजे प्रेम, जबाबदारीची पूर्तता असा चुकीचा ग्रह तर बनत चालला नाही ना?

लहानपणापासूनच छोट्या छोट्या सवयी लावत त्याला स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव करून देता येते. स्वत:ची वॉटरबॅग, डबा भरणे, दप्तर भरणे, जोडे-मोजे एकत्र ठेवणे, गणवेश काढून ठेवणे, खेळणी भरून ठेवणे, आपल्या हातांनी जेवणे अशा दैनंदिन बाबीतून स्वावलंबनाचे धडे देता येतात. चुकतील पण चुकत-चुकत शिकतीलही!

दहा-पंधरा वर्षानंतर व्यक्ती म्हणून स्वतंत्र-स्वावलंबी जीवन जगायला मदत करण्यासाठी ही बीजपेरणी आहे. त्याची कामे त्याला करायला शिकवणे हासुद्धा प्रेमाचाच भाग आहे. मुलांच्या वयाच्या कुठल्याही टप्प्यावर पालकांनी याबाबत जागरूकपणे पावले उचलावीत.