उत्तूरची पालक कार्यशाळा

१५ डिसेंबरला कोल्हापूर जवळील उत्तूर येथे पालकनीतीतर्फे शुभदा जोशी, वृषाली वैद्य व कोल्हापूरच्या प्रतिनिधी विदुला स्वामी यांनी पालक कार्यशाळा घेतली. उत्तूरच्या पार्वती-शंकर विद्यालयात दरवर्षी पालकांसाठी काही उपक्रम घेतले जातात. या पाच तासांच्या कार्यशाळेसाठी सुमारे १५० पूर्व प्राथमिक शाळेतील मुलांचे पालक उपस्थित होते. या पालकांत पुरुषांचा सहभाग विशेष जाणवणारा होता.

पूर्व प्राथमिकच्या या पालक कार्यशाळेत अनेक मुद्यांवर सविस्तर मांडणी केली.

– पालकत्व म्हणजे नेमके काय?

– पालकत्वामध्ये कोणत्या जबाबदाऱ्या अंतर्भूत आहेत?

– पालकत्वाची जबाबदारी सक्षमतेनं निभावण्यासाठी काय करता येईल?

– मुलांशी वागताना नेमकं काय टाळायला हवं? अशा क्रमाने मांडणी केली. या मांडणीत ‘संवाद, भाषाविकास, आमिष-शिक्षा, स्पर्धा, काळानुरूप वाढत्या जबाबदाऱ्या’ या मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. चर्चेमध्ये पालकांनी अनेक प्रश्न विचारले, स्वतःचे अनुभव सांगितले.

मासिकाच्या माध्यमातून होणाऱ्या संवादाला काही मर्यादा असतात. वाचकांशी होणारी अशी प्रत्यक्ष भेट व चर्चा हे संवादाच्या वाटेवरचं पुढचं पाऊल वाटलं. 

– संपादक